Saturday, August 19, 2017

कळसुबाई

कळसुबाई कोण हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा लेख वाचुच नका.  आधी शोधा कोण हि कळसुबाई. 

तर, कितीतरी महिन्यात माझा बऱ्यापैकी मोठा ट्रेक झालेला नव्हता. घोराडेश्वर आणि दुर्गा टेकडी ह्यांची भेट नियमित चालू आहे.  इतर छोटी मोठी फॅमिली भटकंती पण चांगली झाली.  पण मार्च मधल्या भूतान अर्धमॅरेथॉन नंतर काहीच मोठा उद्योग झालेला नाही.  मग माझा मित्र प्रविणला विचारले.  हा अट्टल ट्रेकर असून Whatsapp वर अनेकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे हा माझा "ट्रेकिंग बातमीदार" आहे.
प्रविणने एक भन्नाट प्लॅन सांगितला - १५ ऑगस्टच्या सकाळी कळसुबाई - SG Trekkers बरोबर.   कळसुबाई बद्दल पुस्तकांमध्ये आणि इंटरनेटवर वाचले होते. महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर.  ह्या पलीकडे मला काही माहिती नव्हती.  उंची किती ते भुगोलाच्या पुस्तकात छापले होते का ते माहिती नाही आता.

जायच्या आदल्या दिवशी घशात इन्फेकशन झाले.  डॉक्टरांकडे जाऊन औषधे आणली.  जमेल तेवढा आराम केला.  No show हा option नव्हताच. 
नेहमीप्रमाणे माझी तयारी जोरदार होति.  माझा नविन हेड टॉर्च सापडत नव्हता म्हणुन मित्राचा घेऊन ठेवला.  नंतर माझा पण सापडला. 

रात्री सव्वानऊला मि नाशिक फाट्यावर तयार होतो.  नऊला यायची बस दहानंतर आली.  निघायला साडेदहा झाले.  स्वछंद गिर्यारोहकचा विशाल आणि आम्ही १३ असे एकूण १४ जण होतो.
बसच्या ड्राइवरला फॉर्मुला वन चा कुठलाही वारा लागलेला नव्हता.  त्याने बस मजेत चालविली.
रात्री साधारण साडेतीनच्या सुमारास बारी गावात पोहोचलो.  विशालने पोहे आणि चहा सांगुन ठेवला होता एका घरी.  चहा पोहे झाल्यावर आवरा आवरी करून चालायला सुरुवात केली. 
आमच्यापैकी दोन जण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच ट्रेकिंगला आलेले होते.  डायरेक्ट कळसुबाई.  च्यामारी मधला काही गोंधळच नाही तुंग तिकोना लोहगड कोराईगड वगैरे.

नक्की कुठे जायचंय ते काही दिसत नव्हतं.  पुढे गेलेल्या ग्रुपच्या बॅटरी चमकत होत्या.  Night trek चा हा फायदा असतो.  कुठे जायचंय आणि कसं जायचंय त्याची चिंता करायला काही दिसतंच नाही.  किती चाललोय ते पण कळत नाही आणि दमायला पण होत नाही.

प्लॅन प्रमाणे आम्हाला साधारण तिन तासात शिखरावर पोहोचायचे होते.  सुरुवातीलाच आमच्या ग्रुपचा स्पीड समजुन गेला.  तिन तासात काही सर्वजण पोहोचत नाही.  अंधार असल्यामुळे सर्वजण एकत्र चालत होतो.
बारी गावातली काही कुत्री आमच्या सोबतीला आली. सोबत कसली, त्यांच्या गुरगुरण्याने आणि भांडणांनी वैताग आला.  जवळ जवळ निम्म्यापर्यंत हि कुत्री आमच्या आजुबाजुला बोंबलत येत होति.

रस्ता चुकण्याचा काही प्रश्नच नव्हता.  व्यवथित मळलेली वाट डोंगरावर जात होति.

सूर्योदयाच्यावेळी नारायणरावांनी फक्त तांबडी छटा दाखवली तेवढीच.  नंतर दिवसभर ते फिरकलेच नाहीत.  पूर्ण वेळ ढगांचंच राज्य
उजाडल्यावर आमचा ग्रुप काहीसा मोकळा झाला.  तिन चार जण पुढे गेलो.  फोटोवाले मागे राहिले.  चुकण्याचा प्रश्नच नव्हता.  सर्वजण एकाच वाटेने वर जाणार नक्की.

शिड्या चढुन जायला जाम मजा आली
कळसुबाईला भाविक आणि ट्रेकर्स नेहमी जात असल्यामुळे रस्त्यात अवघड अडथळे कुठेच नाहीत.  काहींना शिड्यांची भीती वाटू शकते.  शिड्या मजबूत आहेत.

कळसुबाई शिखराची उंची आहे १६४६ मीटर (५४०० फूट).  वाटेवरचा हा फलक सांगतोय - तुम्ही जाताय तिकडे फारसं कोणी फिरकत नाही हो.  भान ठेवा कुठे चाललायत.
चार वर्ष दुर्गा टेकडी आणि वर्षभर घोराडेश्वरला जायचा फायदा दिसत होता.  मि चांगल्या स्पीडने चढुन जात होतो.

शिडी मजबुत आहे


आता आपण ढगात पोहोचलो आहोत हे कायम जाणवत होते.

दगड सगळेच घसरडे होते.  पण मि एक शोधलाच जरावेळ बसायला.

मि शिखरावर पोहोचलो तेव्हा एक ट्रेकर्स ग्रुप तिथे आधीच होता.  आम्ही चढाईला सुरुवात केली तेव्हा डोंगरात बॅटरीचा उजेड दिसला तो ह्या ग्रुपचा असणार.  त्यांनी ध्वज बरोबर आणला होता.  त्यांच्याबरोबर मिपण फोटोग्राफी केली.
१५ ऑगस्ट २०१७ चि सकाळ कळसुबाई शिखरावरती


एकेक करत सर्व १४ स्वछंद गिर्यारोहक शिखरावर पोहोचलो.  हळुहळु गर्दी वाढायला लागली होति.  त्यात बाजारबुणगे बरेच दिसत होते.  स्पीकरवर गाणी, ग्रुप डान्स.  कळसुबाई असती तर थयथयाट केला असता.  काही भाविक देवीच्या दर्शनाला भल्या पहाटे उठून आले होते.  प्लॅन प्रमाणे आम्ही ६ वाजता शिखरावर पोहोचणार होतो.  ९ वाजुन गेले तरी आम्ही शिखरावरच होतो.  धुक्यामुळे वेळेचा अंदाजच येत नव्हता. खरंतर आम्ही ढगातच होतो.  मनसोक्त फोटोग्राफी करून झालि.  सर्व ग्रुप्सचि राष्ट्रगीते म्हणुन झालि. खादाडी करून झालि.  आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

परतीला आम्ही बारी गावात जाणार नव्हतो. पहिली शिडी उतरल्यावर आम्ही डावीकडे वळलो.  आम्ही इंदोरी गावाकडे जाणारा रस्ता पकडला.  आमची बस तिकडे येऊन थांबणार होति.  ह्या इंदोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला फक्त आमचंच टोळकं होतं.  १४ स्वछंदी गिर्यारोहक.  हा रस्ता आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ होता. आम्ही सर्व शिड्या आणि सर्व ट्रॅफिक (ट्रेकर्सचे) टाळुन चाललो होतो.  पुढे काय वाढुन ठेवलंय त्याची आमच्यापैकी कोणालाच कल्पना नव्हती.

कळसुबाई शिखराकडून इंदोरी गावाकडे जाणाऱ्या वाटेवर १४ स्वछंदी गिर्यारोहक
दगडधोंडेच काय पायवाट पण घसरडी होति.  कोणी किती वेळा धब्बाक केलं ते आम्ही मोजत होतो.

घरी आल्यावर आता असं वाटतंय, परत कधी जायला मिळेल ह्या ढगांच्या साम्राज्यात
जसजसं पुढे जाऊ लागलो तसतशी वाट आणखीनच अवघड होत चालली.  काहींच्या ट्रेकिंग बुटांना ग्रिप येत होति.  स्पोर्ट्स शुज घातलेले घसरायला लागले.  काहींचा थकवा आता जाणवायला लागला होता.  टोळीची एकजूट फार उत्तम होति. ति तशीच राहिली शेवटपर्यंत.  कॉर्पोरेट मिटिंग मधुन शिकवतात होय टीम बिल्डिंग.  वजनं कशी कमी करायची ते शिकवा त्यापेक्षा.  जाऊदे.  तो वेगळा विषय आहे.

बारी गावातल्या काही मुली वर चढुन आल्या.  त्यांचा स्पीड बघून आम्ही चक्रावलोच.  धडपडत ठेचकाळत जाणाऱ्या आम्हाला पाहून त्या मनातुन हसल्याच असतिल.

एकमेकांना मदत करत अवघड वाट पार पाडली

एका कड्यावर पोहोचल्यावर पुढे उतरणे शक्यच वाटत नव्हते.  पावसाने वाट पूर्णपणे मोडली होति.  विशाल पुढे जाऊन बघून आला.  आम्ही परत फिरायचे ठरवले.  आमच्या टोळीत तिन्ही प्रकारचे ट्रेकर होते - अट्टल ट्रेकर, हौशी ट्रेकर, आणि नवखे ट्रेकर.  सगळ्यांना बरोबर घेऊनच जायचे होते.  प्लॅन बी प्रमाणे आम्ही आता बारी गावची वाट पकडणार होतो.  Junction पर्यंत परत जाऊन बारी गावची वाट पकडली.  हि वाटही तशी मोडलेलीच होति.  पण आता पर्याय नव्हता.

स्वछंद गिर्यारोहक विशाल
कसेतरी घसपटत सरपटत सर्वजण उतरलो.  परतीची वाट संपता संपेना.  एकमेकांना घेऊनच बारी गावात पोहोचलो.  संध्याकाळचे ६ वाजुन गेले होते.  प्लॅन प्रमाणे जेवायच्या वेळेला येणारे आम्ही ६ तास उशिरा पोहोचलो होतो.

नक्की काय झाले
१. बारी गावातून सुरुवात करून आम्ही कळसुबाई शिखरावर गेलो - पिवळा मार्ग
२. कळसुबाई शिखरापासुन इंदूरी गावात जायचा प्लॅन होता - जंकशन पर्यंत हिरवा मार्ग आणि पुढे लाल मार्ग
३. पावसाने वाट मोडल्यामुळे आम्हाला परत फिरावे लागले.  जंकशन पासुन लाल मार्गाने आम्ही जाऊ शकलो नाही.  प्लॅन बी प्रमाणे हिरव्या मार्गाने बारी गावात पोहोचलो.

विशालने बारी गावात जेवणाची व्यवस्था केलेली होति.  मनसोक्त जेऊन गाडीत बसलो.  साधारण १२ वाजता नाशिक फाट्याला गाडीतून उतरलो. गाडी पुढे शिवाजीनगरला गेली.  मि चालत येऊन १ वाजता घरी पोहोचलो. महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर जाऊन आल्यावर ४ किलोमीटर चालायला मरतंय काय.   

सरळ धोपट मार्गाने तर आपण रोजच जातो. अशी अडलेली वाट रोज थोडीच बघायला मिळते.  हि अडलेली वाट आणि १५ ऑगस्ट २०१७ चि कळसुबाईचि यात्रा अविस्मरणीय झालि.

6 comments:

  1. Ekach number... jyapramane vomedi skit madhe puncline important astat.. tyapramane ya lekhatil kahi oli manala ekdum bhidun jatat... mastach...

    ReplyDelete
  2. छान ! वाचून अनुभव घेता आला. छान लिहिलय खूप.

    ReplyDelete